मुंबई : राज्यात बहुतेक भागात पारा ४० अंशांवर गेल्याने तप्त झळांमुळे फळे, भाजीपाला आणि नव्याने लागवड झालेल्या रोपांची होरपळ सुरू आहे. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडीसह पालेभाज्या उन्हामुळे करपत आहेत. उन्हाळी पावसाने दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुबार, धुळ्यात तीव्र उन्हामुळे पपईची झाडे आणि फळे करपली आहेत. जळगाव जिल्ह्यात केळीची पाने करपली. अनेक ठिकाणी केळींवर काळे डाग पडले आहेत. ऊन्हामुळे केळींची झाडे कमकुवत बनत आहेत. रात्रीच्या वाऱ्याने ही झाडे कोलमडून पडत आहेत.
स्ट्रॉबेरीला फटका
महाबळेश्वर, वाई परिसरातील स्ट्रॉबेरीचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आहे. तीव्र उन्हामुळे वेली करपून, जळून गेल्या आहेत, तर स्ट्रॉबेरीवर काळे डाग पडून खराब होत आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम अजून पंधरा दिवस चालला असता. पण, उन्हामुळे आठ दिवसांत आटोपण्याची चिन्हे आहेत.
सोलापूर, उस्मानाबाद, सांगली पूर्व भागात उर्वरित द्राक्षांना उन्हाच्या झळा बसत आहेत. द्राक्ष घडांना सावली करताना शेतकऱ्यांची तारांबळ होत आहे.
उन्हाळ्यात कलिंगड, काकडी, टरबूज, खरबूजला मोठी मागणी असते. पण, उन्हाच्या झळांमुळे वेलवर्गीय पिकांची होरपळ सुरू आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ होते. त्या दरवाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी गुढी पाडव्यानंतर लागवड करतात. पण, वाढत्या तापमानामुळे नव्याने लागवड केलेली रोपे करपत आहेत. त्यामुळे जून, जुलैमध्ये महागाईचा फटका बसू शकतो.
राज्यातील वाढते तापमान फळे, भाजीपाल्यासाठी प्रतिकूल ठरले. केळी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडीसह पालेभाज्यांची होरपळ होतेय. याचा फटका बसून दोन महिन्यांनी पालेभाज्यांच्या दरवाढीचा धोका संभवतो.
वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या नव्याने होणाऱ्या लागवडीवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना पिकांना सावली करावी लागत आहे. तापमान कमी न झाल्यास भाजीपाला शेती अडचणीत येईल.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.डॉ. यशवंत जगदाळे, भाजीपाला गुणवत्ता केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बारामती.