मुंबई : महाराष्ट्रदिनी सर्व विभागीय आयुक्तालय, जिल्हा मुख्यालयांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. परंतु गिरीश महाजन आणि आदिती तटकरे या स्थगिती देण्यात आलेल्या दोन पालकमंत्र्यांच्याच हस्ते अनुक्रमे नाशिक आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात येणार आहे. त्यामुळे महायुतीत ध्वजवंदनावरून मानापमान नाट्य रंगले आहे.

महाराष्ट्रदिनी सर्व विभागीय आयुक्तालय, जिल्हा मुख्यालयांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु २४ तासांमध्ये त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. गेल्या तीन महिन्यांत या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन हे कायम राहतील, असे भाजपच्या वतीने राष्ट्रवादी व शिवसेनेकडे स्पष्ट करण्यात आले आहे. रायगडवरून एकनाथ शिंदे अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा, अशी भाजपची भूमिका आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच रायगड दौऱ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेव्हापासून आदिती तटकरे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्रीपद कायम राहणार, ही चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, शिवसेनेचा विरोध डावलून तटकरे यांचीच ध्वजवंदनासाठी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे येथे ध्वजवंदनासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगलप्रभात लोढा तर उपनगरमध्ये आशीष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. बीडमध्ये इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तटकरे यांना संधी मिळाल्याने सेनेत संताप

अलिबाग : ध्वजारोहणाबाबत शासनाच्या परिपत्रकानंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला. फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यास काय हरकत होती? असा सवाल त्यांनी केला. आदिती तटकरे यांना संधी मिळाल्याने शिवसेनेत नाराजी आहे. उद्या यासंदर्भात पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून तटकरे यांना ध्वजवंदनापासून रोखण्याची व्यूहरचना आखली जाईल असे दळवी यांनी सांगितले.