मुंबई : राज्यातील प्राथमिक शाळांमधील पटसंख्या वाढविण्याचे व त्यात मुलींचे प्रमाण वाढविण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून गेली काही वर्षे त्यासाठी बरेच प्रयत्न झाले. राज्यातील प्राथमिक (पहिली ते आठवी) शाळांची संख्या १,०४,४९९ असून त्यांची पटसंख्या एक कोटी ४६ लाख आहे. त्यात मुलींचा टक्का आधीच्या वर्षाच्या तुलनेत अर्ध्या टक्क्याने वाढला असून पटसंख्येत मुलींचे प्रमाण ४७.२ टक्क्यांवरून ४७.७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

विद्यार्थिनींचे प्रमाण ४६.३६ टक्के

राज्यात २०२२-२३ मध्ये ७८ विद्यापीठे, ५७२५ महाविद्यालये आणि २१८२ स्वायत्त शिक्षण संस्था कार्यरत होत्या आणि त्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या ४६ लाख २१ हजार आहे. त्यात विद्यार्थिनींचे प्रमाण २०२१-२२ मध्ये ४४.५ टक्के होते व त्यात वाढ होऊन २०२२-२३ मध्ये ४६.३६ टक्के झाले.

वैद्याकीय जागांमध्ये वाढ

राज्य सरकारने वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये व प्रवेश क्षमतेमध्ये वाढ करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे वैद्याकीय, दंतवैद्याकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी शिक्षणसंस्था व त्यामधील जागांमध्ये वाढ होत आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात जानेवारीपर्यंत शासकीय आणि खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या जागांची संख्या ९,२२० तर पदव्युत्तरच्या जागांची संख्या ४,१९१ आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयांत पदवीच्या जागांची संख्या १०,००८, पदव्युत्तरच्या जागांची संख्या १,२३२ आहे.

अभियांत्रिकीसाठी जागा उदंड

● अभियांत्रिकी व अन्य तंत्र अभ्यासक्रमांसाठी उदंड जागा असून हजारो जागा रिक्त आहेत.

● अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी ३८० महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता १,१२,९८७ आहे, मात्र ८९,६९३ विद्यार्थी शिकत आहेत.

● पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशक्षमता १,५७,४६४ मात्र १,३४,७१८ विद्यार्थ्यांचाच प्रवेश.

● पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १०,९५१ प्रवेशक्षमता असताना ६,०३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.