अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुढील आठवड्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल पुढील दोन वर्षांसाठी बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो १ च्या (घाटकोपर-वर्सोवा) प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाला २० हजार प्रवासी वाढण्याची शक्यता असून यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) मेट्रोच्या गाड्या आणि फेऱ्या वाढविण्यासाठी विचार सुरू केला आहे. लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. हेही वाचा >>>मुंबई पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला ५० लाखांच्या लाचप्रकरणी अटक गोखले पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा काही भाग २०१८ मध्ये कोसळला होता. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. मोरबी दुर्घटनेनंतर धोकादायक असा गोखले पूल तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार पुढील आठवड्यापासून हा पूल दोन वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. हा पूल बंद झाल्यास अंधेरी पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. अशावेळी या प्रवाशांसाठी मेट्रो १ चा पर्याय उपलब्ध होणार आहे. हेही वाचा >>>कारागृहातील दयनीय स्थिती दाखवण्यासाठी आरोपीची अजब क्लृप्ती; मेलेल्या डासांनी भरलेली बाटली न्यायालयात आणली मेट्रो १ चे दिवसाला २० हजार प्रवासी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी गाड्या आणि फेऱ्या वाढविण्याचा विचार एमएमओपीएलने सुरू केला आहे. पुढील काही दिवसात प्रवासी संख्येचा अभ्यास करून याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.