स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करणे, हे राज्य सरकारचे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप करीत ते न थांबविल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजप नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी दिला आहे.महायुतीच्या कोणत्याही नेत्यालाच नाही, तर कार्यकर्त्यांनाही नाहक त्रास दिल्यास संघर्ष करण्यात येईल आणि परिणामांची जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा या नेत्यांनी दिला आहे. राज्यातील १६ मंत्र्यांवर आरोप व गुन्हे दाखल आहेत. बीड जिल्ह्य़ातील एका आमदाराला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारूनही तो खुलेआम हिंडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून ते मोकाट आहेत. तर शेतकरी आंदोलकांवर मात्र खुनाचे गुन्हे दाखल केले जात असल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली आहे.उसाला योग्य भाव मिळावा, यासाठी केलेल्या आंदोलनात पोलीस शिपाई जखमी झाला होता. मात्र तो बरा होऊन पुन्हा कामावर हजरही झाला. त्यावेळी शेट्टी व त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांना अटकही झाली होती. या शिपायाचे आता निधन झाल्याने शेट्टी व खोत यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करून अटकेची तयारी करण्यात येत आहे. सूडबुध्दीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप महायुतीने केला आहे.