मुंबई: गोरेगाव मुलुंड जोडरस्ता हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रकल्प पूर्ण होण्यास तब्बल सन २०२८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आधीच रखडलेला हा प्रकल्प सध्या प्रगतिपथावर असून हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून दोन वर्षे लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी ९० मिनिटांवरून २० मिनिटांवर येणार आहे.

गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता (GMLR) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.मुलुंड येथील पूर्व द्रुतगती मार्ग आणि गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडण्याची योजना आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीचा गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्प चार टप्प्यांत विकसित करण्यात येत आहे. त्यात उन्नत चक्रीय मार्ग, उड्डाणपूल, बोगदा असे गुंतागुंतीचे प्रकल्प आहेत. ही सगळी कामे पूर्ण करून प्रकल्प पूर्ण करण्यास २०२८ हे वर्ष उजाडणार आहे.

या प्रकल्पातील टप्पा क्रमांक तीन मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे वसाहतीमधून जाणाऱ्या १३ मीटर व्यासाच्या भूमिगत जोड बोगद्याचे काम अंतर्भूत आहे. सध्या गोरेगाव मुलुंड उड्डाणपूलाचे ४८ टक्के काम झाले असून बोगद्याचे बांधकाम १८ टक्के झाले आहे.

वर्सोवा दहिसरलाही जोडणार … गोरेगाव मुलुंड जोडरस्ता हा प्रकल्प वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गालाही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर हे जोडले जाणार आहे. दहिसर ते मुलुंड, ठाणे या प्रवासासाठीही एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. गोरेगाव मुलुंड जोडरस्ता आणि वर्सोवा-दहिसर सागरी किनारा रस्ता यांना जोडणारा मार्ग पूर्ण होण्यास जुलै २०२९ ची मुदत ठरवण्यात आली आहे.

दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला दंड

प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांची अंमलबजावणी ठरविलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने कालमर्यादा निश्चित केली आहे. दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते. दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र उड्डाणपुलाचे बांधकाम अपेक्षित गतीने सुरू न ठेवल्याप्रकरणी कंत्राटदाराला ५० लाख रूपयांचा दंड करण्याची कारवाईही प्रशासनाने केली आहे.

प्रकल्पाची आवश्यकता का

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी – घाटकोपर, जोगेश्वरी – विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ यामुळे या रस्त्यांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने गोरेगाव मुलुंड हा चौथा पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २६५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.