राज्य सरकारचे बँकांना आदेश मुंबई: सहा महिन्यांत निवृत्तिवेतनाची उचल न करणाऱ्या निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यातील शिल्लक रक्कम त्वरित संबंधित कोषागारात जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व बँकाना दिले आहेत. करोना काळात मृत्यू पावलेल्यांच्या खात्यातून परस्पर निवृत्तिवेतनाचे पैसे काढल्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या पाश्र्वाभूमीवर हे आदेश देण्यात आले असून हयातीचा पुरावा दिल्यानंतर अशा व्यक्तीचे निवृत्तिवेतन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या हयातीत निवृत्तिवेतन मिळते, तर कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या वारसांना कुटुंब निवृत्तिवेतन दिले जाते. निवृत्तिवेतनधारकांना वर्षातून एकदा हयातीचा पुरावा सादर करावा लागतो. मात्र गेल्या दीड वर्षात करोनामुळे अनेक निवृत्तिवेतनधारकांचे निधन झाले आहे. अशा सेवानिवृत्तांच्या खात्यात जमा होणारे निवृत्तिवेतन कुटुंबीयांकडून परस्पर काढण्याचे तसेच काही ठिकाणी निवृत्तिवेतनधारकाच्या खात्यातील रकमेचा बँके कडून परस्पर उपयोग करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याची दखल घेत ज्यांच्या खात्यावरील रक्कम गेल्या सहा महिन्यांत उचलली गेली नाही अशा सेवानिवृत्तधारकांचा शोध घेण्याची मोहीम सरकारने सुरू के ली आहे. त्यानुसार ज्या निवृत्तिवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनी गेल्या सहा महिन्यांत निवृत्तिवेतनाची उचल केलेली नाही, अशा निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम विनाविलंब कोषागारात जमा करण्याचे आदेश राज्यभरातील बँकांना देण्यात आले आहेत. तसेच बँकांनी जानेवारी आणि जुलैमध्ये निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यांचा तपशील सादर करावा असेही सांगण्यात आहे आहे. ज्यांच्या खात्यातील निवृत्तिवेतनाची रक्कम कोषागारात जमा करण्यात येणार आहे, ती रक्कम संबंधित व्यक्तीने हयातीचा दाखला सादर के ल्यावरच दिली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.