मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कधीच गेली नसती. काँग्रेसने अयोध्येतील राम मंदिरालाही विरोध केला होता. पण एका कुटुंबाच्या हातात पक्षाचे सर्व निर्णय गेले की पक्षाची आणि देशाची वाट लागते, हे आपण पाहिले, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी केली. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकाराने कांदिवली येथे भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार, आदी उपस्थित होते. हा पुतळा उभारण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात परवानगी देण्यात न आल्याने वाद निर्माण झाला होता. पण शिंदे- फडणवीस यांचे सरकार आल्यावर पुतळा उभारण्याची परवानगी मिळाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनी त्याचे अनावरण करण्यात आले. मुंबईचा महापौर आता भाजपचाच होईल आणि त्यानंतर असली कोण आणि नकली कोण, हे मुंबईकरांना कळेल, अशी टिप्पणी राम नाईक यांनी केली.