राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही, याची खात्री करून घ्यायला हवी. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. जी प्रक्रिया आता सुरु झाली ती अगोदर होवू शकत होती, असेही मलिक म्हणाले. घोडेबाजार सुरु होवू नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिले पाहिजे. भाजपाची सत्ता स्थापन झाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केले आणि पटलावर सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करु शकतो, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही आमदार नवाब मलिक यांनी दिली आहे.

दरम्यान भाजपा – शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारचा दिवस महत्वपूर्ण राजकीय घडामोडींचा होता. १३व्या विधानसभेची मुदत शनिवारी मध्यरात्री संपुष्टात येणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर केला. तर राज्यपालांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना फडणवीस यांना केली होती.