मुंबई : कोकणात हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारणारच, पण त्याच वेळी कोकणात प्रदूषणकारी उद्योग सुरू केले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख तरुणांना रोजगार मिळणार असून किमान पाच लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. कोकणातील मूळ रहिवाशांच्या उपजीविकेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोकणच्या विकासासाठी राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असेही त्यांनी सांगितले. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवात बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ज्यांना कोकणाने भरभरून दिले, त्यांचे सरकार असताना अडीच वर्षांत कोकणचा विकास ठप्प झाला. तेलशुद्धीकरण प्रकल्पाला जनतेमध्ये गैरसमज पसरवरून विरोध करण्यात आला.