मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील २,४६७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) १८८ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या मालमत्तांवर टाच आणली. टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये कुटे ग्रुपच्या कंपन्यांशी संंबधित जमीन, इमारत, प्लांट, यंत्र आदींचा समावेश आहे. या मालमत्ता महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असल्यााची माहिती ईडीकडून देण्यात आली.
ईडीच्या तपासानुसार, आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या (डीएमसीएसएल) माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविण्यात आल्या. गेल्यावर्षी मे ते जुलै महिन्यात कुटे व इतर आरोपींविरोधात फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसुरक्षा कायद्याच्या (एमपीआयडी) कलमांखाली नऊ गुन्हे दाखल झाले होते. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरूपात २,४६७ कोटी रुपये स्वीकारून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
त्या प्रकरणावरून ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. ईडीने याप्रकरणी मार्च महिन्यात २४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबाराव कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि अन्य संबंधित करत होते. विविध ठेव योजना आणून त्यांनी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा केला. वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि एफडीआर कर्ज अशा विविध योजना सुरू केल्या. यात ईडीच्या माहितीनुसार याप्रकरणात चार लाख गुंतवणूकदारांची सुमारे २४६७ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. सुरेश कुटे आणि इतरांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना डीएमसीएसएलकडे पैसे जमा करण्याचे आमिष दाखविल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले.
संस्थेच्या व्यवस्थापनाने निधीचा गैरवापर करून अपहार केला. सुरेश कुटे आणि इतरांनी कट रचून २,४६७ कोटींची रक्कम ‘द कुटे ग्रुप’च्या विविध कंपन्यांना कर्जाच्या स्वरूपात अवैध आणि फसवणूक करून इतरत्र वळवली. या बनावट कर्ज रकमेच्या वितरणानंतर या रकमा ‘द कुटे ग्रुप’च्या विविध कंपन्यांच्या खात्यांमार्फत किंवा थेट रोख स्वरूपात काढण्यात आल्या. सोसायटीकडून मिळालेला हा निधी नवीन व्यवसायात गुंतवणूक, मालमत्ता खरेदी आणि व्यक्तिगत खर्च यासाठी वापरण्यात आला, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली. ईडीने याप्रकरणी विविध मालमत्तांची माहिती घेऊन याप्रकरणात आतापर्यंत चार वेळा विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. याप्रकरणात आतापर्यंत १६२१ कोटी ८९ लाख रुपयांच्या मालत्तेवर टाच आणण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली.