सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे बुधवारी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वडाळा येथील रावळी जंक्शन येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे या मार्गावर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने जाणारी लोकल सुमारे तासभर जागीच खोळंबली होती. या बिघाडामुळे दिवसभरातील २० उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.  त्यामुळे अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरुन रेल्वे मार्गावरुन चालणे पसंत केले. बिघाडामुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दोन तासानंतर खोळंबलेली वाहतूक पूर्ववत सुरु झाली. दरम्यान मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील महात्मा फुले नगरातील नागरिकांनी किमान सुविधा मिळविण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही.