नव्या वर्षांत उपनगरीय प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अंधेरी ते विरार या दरम्यान गाडय़ांचा विस्तार करण्याबरोबरच वेग वाढवण्यावर पश्चिम रेल्वेने भर दिला आहे. त्याचबरोबर गोरेगावपर्यंत आणण्यात येणाऱ्या हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करावा, असा विचार रेल्वे अधिकाऱ्यांकडूनच समोर येत आहे.
या प्रकल्पाबरोबरच मुंबई सेंट्रल ते बोरिवली या दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे कामही वेगाने पूर्ण करण्याची गरज अधिकारीच बोलून दाखवत आहेत.
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘एमयुटीपी-२’ या योजनेअंतर्गत अंधेरी-गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प हाताळण्यात येत आहे.
हे काम अद्याप रखडले असून जोगेश्वरी येथील काही बांधकामांचा अडथळा येत असल्याचे एमआरव्हीसीतर्फे सांगितले जात आहे. मात्र, हा प्रकल्प गोरेगावऐवजी बोरिवलीपर्यंत विस्तारल्यास प्रवाशांना त्याचा जास्त फायदा होईल. बोरिवली ते पनवेल थेट सेवा सुरू करणे शक्य होणार असून बोरिवली-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या फेऱ्यांमध्येही वाढ करता येणार आहे. सध्या या मार्गावर केवळ एकच फेरी सुरू आहे.