संदीप आचार्य, लोकसत्ता मुंबई : दहा महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाच्या भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले. मात्र या रुग्णालयांत अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी जिल्हा विकास योजना वा सरकारकडून निधीच उपलब्ध करून न देण्यात आल्यामुळे अजूनही आरोग्य विभागाच्या बहुतेक रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा अस्तित्वात येऊ शकली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. नगरमधील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संबंधित मंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे तसेच जबाबदार असलेल्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. भंडारा येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर विभागीय आयुक्तांची चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालातील शिफारशींनुसार आरोग्य विभागाने त्यांच्या अखत्यारीतील ५२६ रुग्णालयांपैकी ५१७ रुग्णालयांचे अग्निपरीक्षण करून घेतले, तसेच ४५० हून अधिक रुग्णालयांच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून देण्याबाबतचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवून दिल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, अनेक जिल्ह्य़ांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कामाचे अंदाजपत्रक दिले नसल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. ठाणे जिल्ह्य़ात आरोग्य विभागाची एकूण १४ रुग्णालये असून या सर्व रुग्णालयांचे अग्निपरीक्षण झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी अंदाजपत्रक देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केले त्यालाही तीन महिने उलटून गेले असून अद्यापि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी अंदाजपत्रक आरोग्य विभागाला तयार करून दिलेले नाही. पालघर (१२), सिंधुदुर्ग (११), रत्नागिरी (१२), बुलढाणा (१८), नाशिक (३७), नंदुरबार (१५), जळगाव (२२) आणि अहमदनगर (२६) येथे आरोग्य विभागाची रुग्णालये असून यातील एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यासाठी जिल्हा विकास योजनेतून एक रुपयाही मिळाला नसल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव सांगितले. प्रत्येक दुर्घटनेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यास सांगितले. मात्र आरोग्य विभागाला सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नसेल, तसेच निधी उपलब्ध करून दिला जाणार नसेल तर अग्निसुरक्षा यंत्रणा बसणार कशी, असा सवाल केला जात आहे.