खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. राणा दाम्पत्याला कोर्टाकडून अद्याप दिलासा मिळाला नाही. जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी आज पाच वाजताची वेळ देण्यात आली होती. पण पाच वाजेपर्यंत निकाल लिहून पूर्ण झाला नाही. त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली आहे. अशात उद्या ईद सणामुळे कोर्टाला सुट्टी राहणार आहे. त्यामुळे आता संबंधित निकाल बुधवारी सकाळी अकरा वाजता सुनावला जाणार आहे. कोर्टाकडे आज दुपारी अजून एक महत्त्वाची केस आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावर विचार करणं कोर्टाला गरजेचं वाटलं. बुधवारी याप्रकरणी कोणताही युक्तीवाद केला जाणार नाही, थेट निकाल सुनावला जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी गेल्या आठवडाभरापासून अटकेत असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामिनाबाबत सत्र न्यायालय सोमवारी काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण न्यायाधीश राहुल रोकडे यांनी यावर अद्याप कोणताही निकाल दिला नाही.

शनिवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला विरोध करताना म्हटलं होतं की, देशात सद्य:स्थितीत हिंदुत्त्व हे एक मुख्य सूत्र बनले आहे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी या सूत्राचा राजकीय हितासाठी वापर केला जात आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली होती. पण जामिनाबाबतचा निर्णय त्यांनी राखून ठेवला होता.

नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं होतं. त्यामुळे शिवसैनिक आणि राणा दाम्पत्यांच्या यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शेकडो कार्यकर्ते मातोश्रीबाहेर पहारा देत होते.

यावेळी राणा दाम्पत्यांनी प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. मागील एक आठवड्याहून अधिक काळापासून राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

समाजात दरी निर्माण करणे, सरकारला आव्हान देणे यांमुळे राणा दाम्पत्यांविरोधात आम्ही १२४ अ अंतर्गत कलम लावले, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. शासन व्यवस्था कोलमडावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा या उद्देशाने राणा यांनी कृत्य केले होते, त्या अर्थाने हा राजद्रोह होतो, असे घरत यांनी स्पष्ट केले.

“आरोपींना नोटीस देऊन शांतता ठेवा, परत जा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यांनी नोटीस मानली नाही. शिवाय शासनाला आव्हान दिले. त्यातून त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला,” असंही सरकारी वकील घरत यांनी नमूद केलं होतं.