मुंबई/ठाणे : मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. ठाण्यात एका रिक्षावर झाड पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. गुरुवारीही मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत वरळी, वांद्रे, पवई, बोरिवली, अंधेरी आणि आसपासचा परिसर तसेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई शहरांमध्ये बुधवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. दहिसर येथे सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ४० मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. सायंकाळनंतर पावसाने अधिकच जोर धरला. ठाणे येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत १३ मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ठाणे जिल्ह्यात सकाळी आणि सायंकाळी पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. नाल्यातील पाणी रस्ते, गृहसंकुलांत शिरले. मध्य रेल्वेच्या गाड्या २० मिनीटे उशीराने धावत असल्याने ठाणे तसेच पलिकडील स्थानकांत प्रवाशांची गर्दी झाली. यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुक संथ झाली. बदलापूर, अंबरनाथ भागात विद्याुत पुरवठा खंडीत झाला होता. गुरुवारी कोकण किनारपट्टीसह विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या सरी पडू शकतात.

ठाण्यात रिक्षावर झाड कोसळून एक ठार

ठाण्यातील राबोडी भागात गुलमोहरचा वृक्ष रिक्षावर कोसळल्याने प्रवाशाचा मृत्यू झाला. तौफिक सौदागर (२७) असे मृताचे नाव आहे. रिक्षाचालक शफीक शब्बीर (५०) यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतही बुधवारी शहर आणि पूर्व उपनगरांतील झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे १३ झाडे आणि फांद्या तुटण्याच्या घटना समोर आल्या असून यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.