मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे सखलभाग जलमय झाले. पावसाच्या रौद्ररूपामुळे अनेकांना ‘२६ जुलै’चे स्मरण झाले. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज (मंगळवार) दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने आज सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने आज मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारपासून मध्यम आणि तीव्र ढग दाटून आल्याने पावसाचा जोर वाढला आहे. त्यानंतर, गेल्या तीन दिवसांत पावसाने उसंत घेतलेली नाही. आज पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरांत जोरधारांचा पाऊस कोसळत होता. संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

PHOTOS : विदर्भात पावसाचा पुन्हा कहर

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीवासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. आज साडेआठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये १२३.६ मिमी आणि कुलाब्यात ५५ मिमी पावसाची नोंद झाली.

सांताक्रूझ येथे सोमवारी मध्यरात्री २.३० वाजल्यापासून ते मंगळवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत तीन तासांत ७४.२ मिमी पावसाची नोंद झाली.