मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई आणि पालघरला मुसळधार पावसाचा फटका बसला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले असून अनेकजण रस्त्यांवर तसंच रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.