Mumbai Local : राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज रात्री ९ वाजेच्या सुमारास मुंबई शहरासह ठाणे, बोरिवली, डोंबिवली, सायन, कुर्ला, मुंब्रा आणि दिवा या भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसला असून मुंबईत मध्य रेल्वेची सेवा खोळंबली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता अचानक मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला. या अवकाळी पावसामुळे लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली असून कामारून घरी परताणाऱ्या मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. काही ठिकाणची लोकल सेवा पूर्णपणे कोलमडल्यामुळे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
मुंब्रा स्टेशनमध्ये डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक खोळंबली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ठाणे परिसरातही धुळीच्या वादळानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. दरम्यान, तब्बल पाऊण तास ट्रेन्सची वाहतूक खोळंबून राहिल्यामुळे लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्याचंही सांगितलं जात आहे.
लोकलची वाहतूक खोळंबल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंब्रा आणि दिवा या दरम्यानच्या सर्व अप आणि डाउन मार्गावरील सर्व लोकल गाड्या गेल्या १५ ते २० मिनिटांपासून थांबलेल्या आहेत. तसेच याबाबत आधी कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, नंतर काहीवेळाने मोटरमनने घोषणा केली.
#WATCH | Maharashtra: Weather turns pleasant in Mumbai as parts of the city receives strong breeze and light rain.
— ANI (@ANI) May 6, 2025
Visuals from Marine Drive. pic.twitter.com/Rt0RE16Qb0
कल्याण डोंबिवलीत वादळी वाऱ्यांमुळे वीज पुरवठा खंडित
जोरदार वाऱ्यांमुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. कामावरून घरी परतणाऱ्यांची रेल्वे स्थानकांमध्ये कोंडी झाली. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या प्रवेशव्दारांवर प्रवाशांची पावसाने कोंडी केली होती. जोरदार वाऱ्यामुळे रिक्षा चालक वाहनतळांवरून घरी निघून गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. वीस मिनिटांच्या जोरदार वारा पावसाच्या झटक्याने शहरातील जनजीवन मात्र विस्कळीत केले.