मुंबई : अधिक भाडे घेणे, भाडे दरास नकार देणे याविरोधात आता प्रवाशांना सहजपणे तक्रार करता येणार आहे. दक्षिण मुंबईत काळी-पिवळी, तसेच मोबाईल ‘अ‍ॅप’ आधारित टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ९०७६२०१०१०  हा मोबाइल क्रमांक उपलब्ध केला आहे. या क्रमांकावरील तक्रारीनंतर टॅक्सीचालक दोषी आढळल्यास परवाना किंवा अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबनाची कारवाई होणार आहे.

प्रवाशांच्या मदतीसाठी ताडदेव ‘आरटीओ’ने तीन अधिकाऱ्याचे विशेष पथक नेमले आहे. त्या पथकाकडे एक वाहन उपलब्ध केले असून त्यांच्याकडे संपर्क करण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर ९०७६२०१०१० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. 

प्रवाशांना रात्रीच्या वेळी अडचण निर्माण झाली असल्यास त्याबाबत  mh01taxicomplaint@gmail.com या ई-मेलवरही पुराव्यानिशी तक्रार दाखल करता येणार आहे. तक्रार निवारणाकरिता वेगळा कक्ष तयार करण्यात आला आहे. पुराव्यासह तक्रार प्राप्त झाल्यानंतर टॅक्सी चालकांना नोटीस पाठवून खुलासा मागवण्यात येणार असल्याची माहिती ताडदेव ‘आरटीओ’कडून देण्यात आली. दोषी आढळल्यास परवाना किंवा अनुज्ञप्ती निलंबन किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२२ पासून करण्यात येणार आहे.

जीवनदूत टॅक्सी योजना सुरू..

 रस्ते अपघाताचा प्रसंग आल्यास सेवाभावी वृत्तीने अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी टॅक्सी चालकांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ताडदेव ‘आरटीओ’कडून जीवनदूत सत्कार योजना सुरू करण्यात येत आहे. यामध्ये टॅक्सीचालकांचा गौरव करण्यात येणार आहे.