गिरणी कामगारांसाठीच्या ठाणे-रायगडमधील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील २५२१ घरांची सोडत मागील कित्येक महिन्यांपासून रखडली आहे. पण आता मात्र ही सोडत लवकरच काढली जाण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीसाठीच्या प्रारूप यादीतील १२ हजार ९८१ अर्जदारांची यादी नुकतीच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून शुक्रवारी एक जाहिर निवेदन प्रसिद्ध केले आहे. या यादीतील एकापेक्षा अधिक अर्ज केलेल्या, दुबार नावे असलेल्या अर्जदारांनी मंडळाकडे अर्ज करून यातील कोणता एक अर्ज ग्राह्य धरायचा याबाबतचा विनंती अर्ज सादर करण्याचे आवाहन अर्जदार कामगारांना केले आहे. यासाठी १९ डिसेंबर २०२२ पासून १७ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हेही वाचा >>> मुंबईः महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी मुंबई पोलीस सज्ज; ३१७ अधिकारी व १८७० कर्मचारी तैनात पावणे दोन लाख गिरणी कामगारांकडून घरासाठी अर्ज सादर झाले आहेत. मात्र यात अनेक कामागारांनी एकापेक्षा अधिक अर्ज सादर केले आहेत, काही नावे दुबार आहेत, तर एकाच कुटुंबातील अनेक वारसांनी अर्ज सादर केले आहेत, नावात वा मिलमध्ये तफावत अशा अनेक कारणांमुळे कामगार अपात्र ठरत आहेत. त्यामुळे सोडतीपूर्वीच अर्जांची छाननी करून दुबार अर्ज बाद करावेत आणि अर्जात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत होती. ही मागणी मान्य करून मुंबई मंडळाने सर्व अर्जांची छाननी केली असून त्यात १२ हजारांहून अधिक अर्ज हे दुबार नावे असलेले आहेत. त्यामुळे या १२ हजार ९८१ अर्जदारांची यादी नुकतीच म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर यासंबंधीचे एक निवेदनही शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. हेही वाचा >>> मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यादरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप; याप्रकरणी जनहित याचिका करा;उच्च न्यायालयाची सूचना या निवेदनानुसार अर्जदारांना १९ डिसेंबर ते १७ जानेवारीदरम्यान मंडळाकडे विनंती अर्ज करून कोणताही एक अर्ज ग्राह्य धरण्याचा विनंती करणे आवश्यक असणार आहे. उपमुख्य अधिकारी (गिरणी) मुंबई, मंडळ कक्ष, क्रमांक २०५, पहिला मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे पूर्व येथील कार्यालयात संपर्क साधून लेखी पुरावा, सध्याचे छायाचित्र, ओळखपत्र आणि कोणता एक अर्ज ग्राह्य धरावा यासाठीचा विनंती अर्ज सादर करावा लागणार आहे. दरम्यान गिरणी संकेतांक ५९ मधील १ हजार ५९५ अर्जदारांचीही एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार अनेक अर्जदारांनी संकेतांक चुकविला असून नावामध्ये दुरुस्ती आहे. त्यांनाही आवश्यक ती दुरूस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई मंडळाकडून ही यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने एकार्थाने ही रखडलेल्या २५२१ घरांच्या सोडतीच्यादृष्टीने टाकलेली एक पाऊल आहे. एकूणच आता लवकरच गिरणी कामगारांच्या घरांची सोडत मार्गी लागणार असल्याचे म्हटले जात आहे