मुंबई: अकरावीसाठी प्रवेश अर्ज भरताना प्रत्येक फेरीसाठी शाखा बदलण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे ठराविक महाविद्यालयासाठी आग्रही असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात कोणत्या शाखेसाठी किती प्रवेश बाकी आहेत, हे पाहून निर्णय घेता येणार आहे.
बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशासांसदर्भातील महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करून १९ मे पासून विद्यार्थांना ऑनलाइन नोंदणी करून त्यांची वैयक्तिक माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. अर्ज भरताना कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांपैकी एका शाखेची निवड करावी लागेल. मात्र शाखा निवडताना अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. काही वेळा घरातील किंवा मित्रांच्या सल्ल्यानुसार शाखा निवड केली जाते. मात्र, नंतर शाखा बदलावीशी वाटते. तसेच एखाद्या शाखेत नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र, त्याचवेळी त्या महाविद्यालयांत दुसऱ्या शाखेत प्रवेश मिळणे शक्य असते. अशावेळी विद्यार्थ्यांना शाखा आणि महाविद्यालय निवडणे सोपे व्हावे यासाठी शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक फेरीनंतर शाखा बदलण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक फेरीमध्ये एकच शाखा निवडता येईल. मात्र प्रत्येक फेरीला शाखा बदलण्याची मुभा मिळू शकेल.
फेरीदरम्यान एखाद्या शाखेतून जागा मिळाली, मात्र अन्य शाखेत प्रवेश घ्यायचा असल्यास संबंधित विद्यार्थ्याने पहिल्या शाखेतील जागेवर प्रवेश घेऊ नये. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याला शाखा बदलण्याचा पर्याय उपलब्ध होईल. मात्र प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास थेट तिसऱ्या फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
बनावट कागदपत्रे सादर केल्यास…
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आल्यास त्यावर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे इयत्ता १० वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रकियेतून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
प्रवेश नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क
अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरताना प्रतिविद्यार्थी १०० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.