मुंबई : मुंबईच्या हवेत पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) २.५ धुलीकणांचे प्रमाण वाढत असून, मुंबईत २०२४ मध्ये पीएम २.५ ची पातळी ३६.१ इतकी नोंदवली गेली. शहरातील हवेत २०२४ मध्ये पीएम २.५ च्या पातळीत २.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त ‘रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस’चा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार २०२४मध्ये मुंबईतील हवेत पीएम २.५ धुलीकणांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अॅटलासएक्यू प्लॅटफॉर्मवरील माहिती वापरुन केलेल्या अभ्यासात मुंबईत पीएम २.५ ची वार्षिक सरासरी पातळी ३६.१ इतकी नोंदवण्यात आली. ती २०१९च्या तुलनेत २.६ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच वाहतूक आणि बंदर क्षेत्रासारख्या औद्योगिक केंद्रांमधून होणारे उत्सर्जन हे शहरातील वायूप्रदूषण वाढण्यास कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबईची हवा दिल्लीपेक्षा चांगली असली तरी बंगळुरु आणि चेन्नईपेक्षा वाईट असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, नवी मुंबईत बंदर क्षेत्रातील अवजड वाहतुकीमुळे पीएम २.५ ची पातळी वाढली आहे. पश्चिम उपनगरांत बांधकाम आणि वाहतूक कोंडी यांमुळे तर पूर्व उपनगरांत सतत कचरा जाळणे तसेच औद्योगिक क्षेत्रे जवळ असल्याने तेथे वायूप्रदूषणाच्या पातळीत सतत वाढ होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – तळीये पुनर्वसनाचा दुसरा टप्पा जूनमध्ये पूर्ण

पीएम २.५ हे २.५ मायक्रॉन जाडीचे व त्यापेक्षाही सूक्ष्म धूलिकण जास्त धोकादायक समजले जातात. हवेत पीएम २.५ चे प्रमाण जास्त असते तेव्हा धुरक्याचे प्रमाण वाढते. रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसने मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळरु आणि चेन्नई या शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. त्यात २०१९च्या तुलनेत २०२४मध्ये मुंबईतील पीएम २.५ च्या पातळीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. इतर सर्व शहरातील पीएम २.५च्या पातळीत मात्र घट झाली आहे. दरम्यान, यापूर्वी मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी वाढत असल्याचे ‘ग्रीनपीस इंडिया’ या संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आले होते.

हेही वाचा – भायखळ्यातील भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण

पीएम २.५ धूलीकणांमुळे होणारा त्रास

या धूलीकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्रॉंकायटिस तसेच श्वसनाचे इतर विकार होण्याची शक्यता असते. कारखाने, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, रस्त्यांवरील धूळ यामुळे पीएम २.५ या धूलिकणांची निर्मिती होते. ते सूक्ष्म असल्यामुळे हवा आणि वातावरणात तरंगत असतात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in pm 2 5 levels in mumbai mumbai print news ssb