मुंबई : मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता केवळ श्वसनसंस्था किंवा हृदयविकारांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचा थेट आणि गंभीर परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महानगरातील हवेतील सूक्ष्म प्रदूषणकण, विशेषतः पीएम २.५, पीएम १० आणि ऑझोनसारखे घातक वायू, डोळ्यांच्या पृष्ठभागावर सातत्याने परिणाम करत असल्याने मुंबईकरांमध्ये विविध नेत्रविकारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

अलीकडेच करण्यात आलेल्या एका स्थानिक आरोग्य सर्वेक्षणानुसार सुमारे ४४ टक्के मुंबईकरांनी प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, लालसरपणा, खाज, कोरडेपणा किंवा सतत पाणी येणे यांसारख्या तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांमध्ये या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. दीर्घकाळ घराबाहेर राहणारे कर्मचारी, वाहनचालक आणि बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना या समस्यांचा सर्वाधिक सामना करावा लागत असल्याचेही आढळून आले आहे.

वैज्ञानिक अभ्यासांनुसार पीएम २.५, पीएम १० हे अतिसूक्ष्म प्रदूषणकण थेट डोळ्यांच्या पृष्ठभागावर साचतात. हे कण डोळ्यांच्या नैसर्गिक अश्रुपटलाला नुकसान पोहोचवतात. परिणामी ‘ड्राय आय सिंड्रोम’, कंजंक्टिव्हायटिस, सततची खाज, लालसरपणा आणि डोळ्यांतून पाणी येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणामुळे निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दीर्घकालीन दाह डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड (सीपीसीबी) च्या आकडेवारीनुसार, मुंबईतील वार्षिक सरासरी पीएम २.५ पातळी सुमारे ३५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. ही पातळी भारतीय राष्ट्रीय मानकांच्या मर्यादेत असली, तरी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या ५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल सात पटींनी अधिक आहे. काही वाहतूक कोंडी असलेल्या आणि बांधकाम सुरू असलेल्या भागांमध्ये पीएम १० पातळी १०० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरच्या पुढे गेल्याची नोंदही करण्यात आली आहे.

नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणाचा हा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. घराबाहेर जाताना संरक्षक चष्म्यांचा वापर, डोळे वारंवार स्वच्छ पाण्याने धुणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरणे आणि प्रदूषण जास्त असलेल्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळणे गरजेचे आहे.तज्ज्ञांचे असेही मत आहे की, जर प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या नाहीत, तर येत्या काळात मुंबईत डोळ्यांच्या आजारांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक खबरदारीसोबतच प्रशासनाकडूनही ठोस पावले उचलली जाणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधील प्रदुषण हे एकूणच आरोग्यासाठी घातक असून श्वसनविकारासह अनेक आजार उद्भवतात तसेच डोळ्यांचे विकारही यातून वाढतात असे ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितले.