सिद्धिसाई दुर्घटनेतील जखमींची दोषींवर कठोर कारवाईची मागणी घाटकोपर पश्चिमेकडील सिद्धिसाई इमारतीतील नऊ कुटुंबांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेला आठवडा उलटला असला तरी या कुटुंबीयांच्या मनात आयुष्याचं मातेरं झाल्याची भावना आहे. या इमारतीत राहणाऱ्या ठक कुटुंबीयांची तीन महिन्यांची मुलगी रेणुका, तिची आई अमृता व प्रमिला या तिघींचा मृत्यू झाला. त्यामुळे ललित ठक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर या दुर्घनेसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या इमारतीतील लालचंदा रामचंदानी यांनी केली आहे. गेल्या आठवडय़ात मंगळवारी सकाळी ही चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत इमारतीतील १७ रहिवाशांचा मृत्यू झाला. तर १३ जणांवर रुग्णालयात उपचार देण्यात आले. मात्र अजूनही चार रहिवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू असून यातील दोन रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. गेले अनेक दिवस सिद्धिसाईच्या तळमजल्यावर हॉटेलचे बांधकाम सुरू होते. या बांधकामामुळे इमारतीच्या मुख्य खांबांना (पिलर) धक्का बसल्यामुळे इमारत कोसळली असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. शिवाय कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा काढताना बचावपथकाला तळाखाली अनेक लोखंडाचे टेकू लावलेले खांबही आढळले आहेत. या अपघातात एकाच घरातील अनेकांना जीव गमवावा लागला. या जखमींना तातडीने राजावाडी व शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार देण्यात आले. सध्या राजावाडी रुग्णालयात अब्दुल मोहम्मद शेख (५७) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या गुडघ्याखालील पायाचे हाड मोडल्याने त्यांना अजून काही दिवस रुग्णालयात उपचार दिले जातील, असे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय प्रमुख डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले. घाटकोपर पश्चिमेकडील सिद्धिसाई इमारतीजवळील शांतिनिकेतन या रुग्णालयात रिद्धी खालचंदानी (४६), प्रज्ञाबेन जडेजा (५०), राजेश दोशी (५७) यांच्यावर उपचार सुरू आहेत. रिद्धी खालचंदानी यांना इमारतीच्या अपघातादरम्यान मेंदूमध्ये रक्तस्रााव झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे. त्यांची प्रकृती स्थिरावत असून पुढील धोका टाळण्यासाठी काही दिवस त्यांना रुग्णालयातच उपचार देण्यात येतील, असे शांतिनिकेतन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल लोखंडे यांनी या वेळी सांगितले. प्रयत्नांची पराकाष्ठा १५ तासांनंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या राजेश दोशी यांना मधुमेह आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यासही त्रास होत होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र पायाची जखम बरी होईपर्यंत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जातील. येथे उपचार घेणाऱ्या प्रज्ञाबेन जडेला यांना पायाला व हाताला फ्रॅक्चर झाले आहे. पुढील आठवडय़ापर्यंत सिद्धिसाईतील तीनही रहिवाशांना सोडण्यात येईल, असे डॉ. लोखंडे यांनी सांगितले.