मुंबई: क्वासिस ई मोबिलिटी या कंपनीचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी लागेबांधे आहेत का आणि त्या कंपनीवर पाश्चात्त्य देशांत घोटाळय़ाचे आरोप आहेत का याची तपासणी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली जाईल व प्रतिकूल अहवाल आल्यास विद्युत वाहनांबाबत व्यवहाराचा फेरविचार केला जाईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केली. या कंपनीबाबत आशीष शेलार यांनी केलेल्या आरोपांबाबत ठाकरे यांनी ही घोषणा केली. तसेच ब्रिटनमधील एका संस्थेच्या माध्यमातून या कंपनीने राज्य सरकारशी संपर्क साधत महाराष्ट्रात विद्युत वाहन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला. तळेगाव येथे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला आणि भविष्यात ३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा त्यांनी प्रस्ताव दिला.