मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे काय समर्थन करू शकतात, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या आपल्या आदर्शाचा अपमान करणाऱ्या भाजपचा आता खरा चेहरा समोर आला आहे. राज्यपाल कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधेंदू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची पाठराखण कसे करतात, असा सवाल पटोले यांनी केला. मुंबईत आंदोलन राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपतींना पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने वादग्रस्त विधाने करीत असल्याने राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे. त्यामुळे राज्यपालांना समज द्यावी किंवा त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून दूर करून त्यांची अन्य राज्यात नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी ही माहिती दिली.