मुंबई : देशात महागाईचा आगडोंब माजला आहे आणि हा भडका शमवण्यासाठी व्याजाचे दर आणखी वाढविणार असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. व्याजाचे दर वाढणे अटळच पण ते गुंतवणूकदार म्हणून आपल्या फायद्याचे की त्यातून आपली जोखीम आणखी वाढेल? या प्रश्नाची उकल करून नजीकच्या काळातील पैशाला मोठे करणारम्य़ा गुंतवणुकीच्या वाटा सांगणारे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शन येत्या मंगळवारी योजण्यात आले आहे. 

क्वांटम म्युच्युअल फंड

प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा गुंतवणूक जागर येत्या मंगळवारी, ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पार पडणार आहे. उच्च चलनवाढ आणि चढय़ा व्याजदराच्या काळात गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयाचे पैलू आणि करावयाचे बदल याबद्दल वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी हे मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रोते गुंतवणूकदारांना त्यांच्या शंका आणि नेमक्या प्रश्नांची उत्तरेही यानिमित्ताने मिळविता येतील.   

आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि परताव्याचा हा पैलू त्या गुंतवणुकीला असणाऱ्या जोखमीचा पदर कसा यावरूनही ठरतो. म्हणजे महागाई जितकी वाढत जाईल तितकी ती गुंतवणुकीवरील परताव्याचा घास घेत जाईल. एकंदरीत गेल्या काही महिन्यांतील शेअर बाजारातील वादळी चढ-उतारातही याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. व्याजदरातील वाढ जरी बँकांतील मुदत ठेवीदारांसाठी वरदान ठरणार असली तरी ती कर्जदारांसाठी त्रासदायक आहे. कर्जाचे वाढलेले हप्ते हे प्रसंगी कुटुंबासाठी आखलेल्या अंदाजपत्रकाची घडी विस्कटणारे ठरू शकतील. हे टाळण्यासाठी या काळात बचत कशी व कुठे करावी, म्युच्युअल फंडांमध्ये सुरू असलेल्या ‘एसआयपी’चे काय करावे, नवीन पर्याय कोणते आणि कोणत्या मार्गाने जाणे टाळावे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’मध्ये सहभागासाठी नि:शुल्क नोंदणी आवश्यकच आहे.