लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : दावोस आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात विक्रमी ३० लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे करार करण्यात आले असून येत्या महिनाभरात आणखी १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होतील. यातून ४० लाख रोजगार निर्माण होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर टाटा सन्सच्या साह्याने इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.

स्वित्झर्लंडमध्ये वार्षिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या दावोस आर्थिक परिषदेत राज्याने केलेल्या गुंतवणूक करारांपैकी ७५ टक्के करारांची अंमलबजावणी झाली असून काही प्रकल्प सुरुही झाले आहेत. सर्वसाधारणपणे गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार केल्यानंतर तो पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी पाच ते सात वर्षांचा कालावधी लागतो. राज्यात मात्र कमी कालावधीत हे प्रकल्प सुरु झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आतापर्यंत ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले असून ही गुंतवणूक सेवा, कृषी, तंत्रज्ञान क्षेत्रात येणार आहे. एकूण गुंतवणुकीपैकी ८३ टक्के ही थेट परदेशी गुंतवणूक असून उर्वरित गुंतवणुकीमध्ये देशातील कंपन्या असल्या तरी त्यांनी परदेशातील कंपन्यांनी तंत्रज्ञान व अन्य साह्याबाबत करार केले आहेत. गुंतवणूक करणाऱ्या जगभरातील १८ देशातील नामवंत कंपन्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.