मुंबई : जैन मंदिरावरील कारवाईवरून वाद सुरू असताना सर्वच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सावध भूमिका घेतली आहे. कारवाईनंतर जैन समुदायाने काढलेल्या मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मंदिर पाडण्यापेक्षा ते नियमित करण्याकडेच या सर्व लोकप्रतिनिधींचा कल असून याप्रकरणी काही राजकीय नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया.
मंदिराचे पाडकाम करणे हे खूप खेदजनक आहे. मंदिर नियमित करण्यासाठी मध्यम मार्ग काढता आला असता. कायद्याच्या चौकटीत राहून आणि न्यायालयीन निर्णयांच्या अधीन राहून मार्ग काढावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. – पराग अळवणी, भाजप आमदार
आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना आम्ही या मंदिरावरील कारवाई दोन वेळा रोखली होती. आता न्यायालयाचे आदेश काय आहेत ते तपासूनच निर्णय घ्यायला हवा. मात्र हे मंदिर तोडल्यामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. हे मंदिर अनधिकृत होते तर इतके दिवस कसे काय राहिले. – सुनील प्रभू, शिवसेना आमदार (ठाकरे)
अनधिकृत बांधकाम असेल ते तोडलेच पाहिजे. अनधिकृत दर्गा आम्ही तोडायला लावलाच होता. याप्रकरणातही पालिकेच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. न्यायालयाने स्थगिती दिली आणि तरीही ते पालिकेने तोडले असेल तर ते चुकीचे आहे. – संदीप देशपांडे, मनसे