बिहारमध्ये झालेली दोन अभियंत्यांची हत्या म्हणजे राज्यात पुन्हा ‘जंगल राज’ सुरू झाल्याचे उदाहरण होय, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी मुंबईत व्यक्त केले. जदयूचे नितिश कुमार हे केवळ नावाला मुख्यमंत्री असून सगळी सूत्रे आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याकडे असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. बिहारमध्ये पुन्हा जंगल राज सुरू झाले आहे. याबाबत आम्ही आमच्या प्रचारातून लोकांना सूचना करत होतो, असेही ते म्हणाले. गिरीराज हे लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे राज्यमंत्री असून ते विभागाच्या मुंबईतील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी रविवारी आले होते. बिहारच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असले तरी राज्यात पुन्हा एकदा लूटमार, हत्या, खंडणी यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होईल असेही ते म्हणाले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.