राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देशातील जातीयवादावर टीकास्त्र सोडलं आहे. देशात दलित माणसाला राष्ट्रपती होता आलं ही संविधानाने दिलेली देणगी असल्याचं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तसेच दुसरीकडे आपल्याच लग्नात दलित माणसाला घोड्यावर बसता येत नाही ही देशातील जातीव्यवस्थेची करणी असल्याचा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "दलित माणूस या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो ही संविधानाने दिलेली देणगी आहे. दलित माणूस आपल्या लग्नात घोड्यावर बसू शकत नाही ही जातीव्यवस्थेची करणी आहे!" "बापाची जात बंधनकारक का?" दरम्यान, जितेंद्र आव्हाड जातीवादावर रोखठोक भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी याआधी देखील जातीच्या मुद्द्यावर अनेकदा रोखठोक भूमिका घेतल्या आहेत. याआधी त्यांनी आंतरजातीय विवाहात मुलांनी बापाची जात लावायची की आईची याच्या निवडीचं स्वातंत्र्य मुलांना द्यावं अशी मागणी केली होती. ते म्हणाले होते, "जात लावताना ती बापाची लावली जाते. बापाची जात बंधनकारक का? आई हा महत्वाचा घटक मग तिची जात का लावता येऊ नये. जात लावताना पाल्याला स्वातंत्र्य द्यावे कुठली जात लावावी आईची की बापाची." याशिवाय आव्हाड यांनी एका नोकरीची जाहिरात ट्वीट करत जातीच्या निकषावर भरती करणाऱ्यांना विरोध केला होता. हेही वाचा : “ठाण्यात कोणाचं लग्न झालं, मुलगा झाला तरी श्रेय घ्यायची सवय”, फडणवीसांच्या आरोपावर जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर, म्हणाले… यात त्यांनी म्हटलं होतं, "हा जाती भेद नाही का? आणि आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की आम्ही गुन्हेगार."