दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईत सुरु असलेलं आंदोलन आज मागे घेण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया येथून आझाद मैदानात हलवलं होतं. संवेदनशील जागा असल्याने पोलिसांनी आंदोलकांना गेटवे ऑफ इंडिया येथून हटण्यास सांगितलं होतं. आझाद मैदानात गेल्यानंतर काही वेळातच आंदोलकांनी आपण आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान यावेळी आंदोलक आंदोलनस्थळ सोडत असताना पोलिसांनी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची ओळखपत्रं तपासली. पोलिसांनी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची नावंदेखील नोंद करुन घेतली आहेत. यासाठी अनेक पोलीस कर्मचारी वही घेऊन बसले होते.

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला. जेएनयूमधील हल्ल्याचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने विद्यार्थी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जमले आणि रात्रभर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. ‘ऑक्युपाय गेटवे’ या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे ‘गेटवे’कडे वळू लागले. मंगळवारी पोलिसांनी आंदोलकांना गेट वे ऑफ इंडिया या परिसरातून हटवलं. तसंच त्यांची रवानगी आझाद मैदानात करण्यात आली. परंतु काही वेळानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

आणखी वाचा – JNU Protest : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

“आम्हाला पोलिसांनी जबरदस्ती आझाद मैदानात नेलं होतं. परंतु आम्ही ‘ऑक्युपाय गेटवे’ हे आंदोलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन यशस्वी झालं आहे. असं असलं तरी आमचा विरोध कायम राहील. आमच्याकडे अनेक नियोजित कार्यक्रम आहेत,” अशी प्रतिक्रिया आंदोलक कपिल अग्रवाल याने दिली.