मुंबई : राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून प्रसिद्ध जेएसडब्ल्यू कंपनीने राज्य सरकारसोबत सुमारे ३५, ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन, जेएसडब्लू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, व्यवसाय प्रमुख अभय याज्ञिक, प्रवीण पुरी आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प सुरू केला जाणार आहे. भिवली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यात एकू ण ५ हजार मेगावॉट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. १८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही  देसाई यांनी दिली.