अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका स्कॅन न झाल्याने सातव्या सत्रात अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले होते. असाच प्रकार आठव्या सत्राच्या बाबतीतही घडला. यामुळे मंगळवारी जाहीर झालेल्या अभियांत्रिकीच्या निकालातही अनेक विद्यार्थी नापास झाल्याचे समोर आले आहे.
उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून ऑनलाइन तपासणीचा घाट विद्यापीठाने एक वर्षांपूर्वी घातला. यामुळे काम सोपे होण्याऐवजी ते आणखी अवघड होऊन बसले. स्कॅनिंग करताना अनेक त्रूटी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल चुकीचे लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तपत्रिका पूर्णपणे स्कॅन केल्याच जात नाही तर काहींच्या पुरवण्या स्कॅनिंग न झाल्यामुळे नापास झाल्याचा आरोप अधिसभा सदस्या सुप्रिया करंडे आणि संजय वैराळ यांनी केला. आठव्या सत्राची परीक्षा संपून ६६ दिवस उलटून गेले तरी निकाल जाहीर झाला नव्हता. याबाबत विचारणा केली असता मंगळवारी चार शाखांचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र त्यातही गोंधळ असल्याचे त्या म्हणाल्या. निकाल जाहीर होताच अनेक हुशार विद्यार्थ्यांनाही नापास झाल्याचे समजले. यामुळे या सत्राच्या उत्तरपत्रिका स्कॅनिंग करतानाही गडबड झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. विद्यापीठाला अमूक एका कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी कोणता राजकीय दबाव आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
गुणपत्रिकेतही चुका
बीएचा निकाल लागून २० दिवस उलटून गेल्यानंतर अखेर विद्यापीठाने उत्तरपत्रिकांचे वाटप करण्यास सुरुवात केली. पण यामध्येही घोळ झाला असून पास असलेल्यांना नापास दाखविण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठाने या चुकाही दुरूस्त कराव्यात असेही करंडे यांनी नमूद केले आहे.