नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेले कबीर कला मंचचे कार्यकर्ते सचिन माळी आणि शीतल साठे यांनी मंगळवारी विधानभवनाबाहेर आत्मसमर्पण केले. आपले हे आत्मसमर्पण नसून, सत्याग्रह असल्याचे या दोघांनीही पत्रकारांना सांगितले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप झाल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून हे दोघेही भूमिगत होते. पोलिस या दोघांचा शोध घेत होते. पोलिसांनी आमच्यावर ठेवलेले आरोप चुकीचे असून, आम्ही नक्षलवाद्यांना मदत करीत नाही. आम्ही केवळ फुले-आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या दोघांनीही शरणागती पत्करली, त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, भालचंद कांगो तिथे उपस्थित होते.