साध्वी कांचनगिरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांचं उत्तर भारतीयांवर प्रेमच आहे. लोकांनी त्यांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ घेतला असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांनी राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीत पाठिंबा दिला पाहिजे असंही मत व्यक्त केलं.

कांचनगिरी म्हणाल्या, “राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर खूप प्रेम आहे. त्याचं म्हणणं आहे की बिहारमधील गावांमधून लोकांचं पलायन होतंय. तिथंच कंपन्या सुरू झाल्या तर लोकांना गावातच रोजगार मिळू शकतील. त्यांना घर सोडून जावं लागणार नाही. त्यांच्या याच भूमिकेला लोकांनी चुकीचं घेतलं. ते जितकं प्रेम महाराष्ट्रातील लोकांवर करतात तितकंच प्रेम उत्तर भारतीय लोकांवर करतात.”

“राज ठाकरेंचा डिसेंबरमध्ये अयोध्येला जाण्याचा विचार”

“राज ठाकरे डिसेंबरमध्ये अयोध्येला जाण्याचा विचार करत आहेत. जे हिंदुत्वावर प्रेम करतात ते अयोद्धेशी जोडलेले आहेत. आम्ही त्याचं भव्य स्वागत करू. पूर्ण संत समाज त्यांच्यासोबत आहे. राज ठाकरे जे बोलतात ते करतात हे मला खूप आवडलं. देशाला अशाच लोकांची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील युपी-बिहारच्या लोकांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच त्यांनी आता मुंबईत राहताना काळजी करण्याचं कारण नाही. राज ठाकरेंच्या मनात उत्तर भारतीयांविषयी चांगली भावना आहे,” असं मत कांचनगिरी यांनी व्यक्त केलं.

“हिंदू राष्ट्र व्हावं ही आमची इच्छा आहे. आमची राज ठाकरे यांच्याशी विचारधारा जुळते आहे. हिंदू राष्ट्र धोक्यात आहेत. त्यामुळे हिंदूत्व विचारधारा असणाऱ्या सर्व नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे,” असं आवाहनही कांचनगिरींनी केलं.

संन्यासी लोकांनी राजकारणात यावं का? योगी आदित्यनाथांवर विचारलेल्या प्रश्नावर कांचनगिरी म्हणतात…

कांचनगिरी म्हणाल्या, “जुना इतिहास आहे की संतांनी राज्यांचं नेतृत्व केलंय. चंद्रगुप्त मौर्या यांचं उदाहरण पाहू शकता. त्यांना चाणाक्याने मार्ग दाखवला. त्यानंतर ते यशस्वी राजा बनले. हे संतांचं कामच आहे की राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणं.”

“गरज पडल्यास राजकारणात येणार का?”

“माझा राजकारणाशी संबंध नाही. जे खरे राष्ट्रवादी राजकीय नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात राहू. पण सध्या पदाबाबत कोणताही विचार नाही,” असंही कांचनगिरी यांनी सांगितलं.

“भारतात हिंदूंना शरणार्थी बनावं लागेल, पुढील १० वर्षात अफगाणिस्तानसारखी स्थिती होऊ शकते”

कांचनगिरी म्हणाल्या, “अफगाणिस्तानचे काय हाल झालेत हे सर्वजण पाहत आहेत. पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते. हिंदूस्थान त्या धोक्याच्या किनाऱ्यावर आहे. १० वर्षांनंतर हिंदूंना शरणार्थी बनावं लागेल. आज हिंदू जागे झाले नाही तर कधीच जागे होणार नाही.”

हेही वाचा : अखेर भाजपा-मनसेमध्ये झाला समझोता; आगामी निवडणुकीत असा असेल ‘फॉर्म्युला’

“काश्मीर आज नाही तर खूप आधीपासून जळत आहे. हे सर्व नेहरू आणि गांधीजींमुळे झालंय. पाकिस्तानला वेगळं केलं नसतं, तर काश्मीर का जळालं असतं? मग का फाळणी करण्यात आली. अफगाणिस्तान देखील आपलंच होतं. त्याला कंधारच्या नावानं ओळखलं जातं,” असंही त्यांनी नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :