मुंबई : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे, असे मुळीच होता कामा नये. लोकांचे  दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे. महत्त्वाची कामे खोळंबू नयेत, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.

राजकीय अस्थिरता असली तरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी  सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या दूरदृश्य बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला. करोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा  याविषयी महत्त्वाच्या सूचनाही केल्या.

 ‘मुखपट्टी सक्तीची वेळ येऊ देऊ नका’

राज्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला. करोनाचा प्रसार झपाटय़ाने वाढू लागला आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांत  मुखपट्टी लावणे आवश्यक आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत करोना पोहचू नये म्हणून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.  त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. संसर्गाचा वेग रोखण्यासाठी उपनगरीय  रेल्वे प्रवासात  मुखपट्टी सक्ती करावी किंवा नाही याबाबत तसेच अन्य नियमावली लागू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावेळी नाशिक, पुणे, अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी देखील करोना उपाययोजनांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुंबईतील नालेसफाई तसेच मलेरियचा प्रादुर्भाव याविषयी माहिती घेऊन सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती घेऊन ती अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.   

‘वारकऱ्यांची काळजी घ्या’

 आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात एकाच दिवशी सात ते आठ लाख वारकरी एकत्र  आले होते. एवढी गर्दी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वारीत सहभागी दिंडी प्रमुखांशी संवाद साधण्याची सूचना केली. त्यांना करोना परिस्थितीचे गांभीर्य समजावून द्या. वारीत वारकरी मंडळी देहभान हरपून सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करण्यात यावी. विशेषत: मुखपट्टी वापरणे, वारीच्या मार्गावर स्वच्छता, शक्य आहे तिथे शौचालयांची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा याबाबतीत जाणीवपूर्वक काळजी घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘पेरण्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा’

राज्यातील पीकपाणी आणि पावसाबाबतही कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. राज्यात १३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून गेल्या वर्षी याच सुमारास २३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. विखुरलेल्या परिस्थितीत पाऊस पडत आहे. बियाणे खतांची उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. एक जुलै रोजी कृषी दिन आहे. त्याआधी २५ जून ते १जुलै हा कृषी संजीवनी सप्ताहही आय़ोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गावागांवामध्ये कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसाराबाबत माहिती देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पेरण्या करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे सांगितले.