महाविकास आघाडी १७ डिसेंबर रोजी राज्य सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. हा मोर्चा नैराश्य आणि वैफल्यातून काढण्यात येत असल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्र सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकला विनंती करत म्हणाले “हे उकसवायचं काम…”

काय म्हणाले केशव उपाध्यय?

“काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी १७ डिसेंबरला राज्य सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. जनादेश खुंटीला टांगून मिळवेली सत्ता गेल्यानंतर आलेल्या नैराश्यतून हे आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीला आता विरोधकांची भूमिकाही जमत नाही आहे”, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

“सत्ता गेलेल्याच्या वैफल्यातून घोषित केलेला हा मोर्चा आहे. सत्तेत असताना सीमावादावर एक बोलायचं आणि विरोधात असताना दुसरं बोलायचं, ही उद्धव ठाकरेंची खासियत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, हा मुद्दा सर्वोच्च न्यायलयात प्रलंबित असून त्याचा निकाल स्वीकार करू, तोपर्यत हा भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी केली त्यांनी केली होती. मात्र, आज ते म्हणत आहेत की सीमावादाचा प्रश्न आम्ही मार्गी लावू. आज बेंडकुळ्या दाखवत गप्पा मारणारे उद्धव ठाकरे तेव्हा हा भाग केंद्रशासित करायला तयार होते. मुख्यमंत्री असताना वेगळं बोलत होते आणि आता सत्ता द्या महाराष्ट्र कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सोडवतो, अशी भूमिका ते मांडत आहेत. त्यामुळे १७ डिसेंबरचा त्याचा मोर्चा वैफल्यग्रस्तांचा आहे”, असेही ते म्हणाले.

“मुख्यमंत्री असताना मी आणि माझं कुटुंब एवढीच जबाबदारी घेतलेले उद्धव ठाकर आज सत्ता आल्यास राज्यातील अनेक प्रश्न सोडवू म्हणत आहेत. मुळात हे उशीरा सुचलेलं शहानपण नाही, निराशेतून आलेली विधान आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – शिवसेनेतील बंडखोरीच्या सर्व याचिकांवर सुनावणी होणार, तारीख सांगत सरन्यायाधीश म्हणाले, “घटनापीठात…”

“महाविकास आघाडी सरकारने १७ तारखेचा मोर्चा नक्की काढावा, मात्र, त्यावेळी त्यांनी काही प्रश्नांची उत्तर द्यायला हवी. करोनाचे सर्वाधिक बळी महाराष्ट्रात गेले आणि मुख्यमंत्री स्वताच्या कुटुंबियांची जबाबदारी घेऊन बसले होते, हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचे ढळढळीत अपयश होतं. त्यामुळे मी आणि माझं कुटुंब एवढीच भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर आधी द्यायला हवं. करोना काळात देशभरातील शेतकऱ्यांना मदत होत असताना महाराष्ट्र सरकारने एक पैशाची मदत शेतकऱ्यांना केली नाही. महाराष्ट्राचा अपमान तिथेही होता. यासंदर्भातही त्यांनी बोलायला हवं”, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Keshav upadhye criticized mahavikas aghadi on 17 december agaition against shinde government spb
First published on: 06-12-2022 at 15:09 IST