घाटकोपरमधील तरुणाचे अपहरण करून दोन कोटींची खंडणी उकळणाऱ्या अपहरणकर्त्यांनी काही पैसे विविध देवस्थानांना अर्पण करून पापक्षालन करण्याचा प्रयत्न केला होता. तर काहींनी कर्ज चुकवून मैत्रिणींवरही पैसे उधळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 घाटकोपरच्या टिळकनगर येथून २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करणाऱ्या ९ जणांना मुंबई गुन्हे शाखेने दीड महिन्यांच्या प्रयत्नांनंतर अटक केली. या टोळीने मुलाच्या कुटुंबीयांकडून २ कोटी रुपयांची खंडणी उकळली आणि मुलाला सोडून दिले. पैसे मिळाल्यावर त्यांनी रक्कम वाटून घेतली. त्यांनतर अजित अपराज, राकेश कनोजिया आणि दीपक साळवे देवदर्शनाला गेले. मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात त्यांनी काही रक्कम दान केली. शिर्डीला जाण्याचीही त्यांचा बेत होता. पण तोपर्यंत पोलिसांनी त्यांना पकडले.
या टोळीचा म्होरक्या आणि मेकॅनिकल इंजिनीअर अजित अपराज याने कर्ज फेडले आणि वकील पत्नी भारतीचे गहाण असलेले दागिनेही सोडवले. राकेश कनोजिया याने आपल्या मैत्रिणींवर खंडणीच्या पैशांची उधळपट्टी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.