पवई येथील हिरानंदानी रुग्णालयातील किडनी चोरी प्रकरणानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प पडलेल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मूत्रपिंड विकारतज्ज्ञांच्या (नेफ्रॉलॉजिस्ट) संघटनेने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉ. ए. एल. कृपलानी यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना पत्र पाठवून संघटनेचा निर्णय कळवला आहे. हिरानंदानी रुग्णालयात जुलै महिन्यात किडनी चोरीचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी हिरानंदानी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांसह पाच डॉक्टरांनाही अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ नेफ्रॉलाजिस्ट व युरोलॉजिस्ट तज्ज्ञांच्या संघटनेने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री सावंत यांनी डॉक्टरांना शस्त्रक्रिया बंद करता येणार नाहीत, असा इशारा दिला होता. परंतु त्यानंतरही तज्ज्ञांनी शस्त्रक्रिया बंद आंदोलन सुरूच ठेवले होते. प्रत्यारोपण कार्यपद्धती अधिक परिणामकारक करण्यासाठी तसेच जबाबदारी निश्चितीसाठी राज्य सरकारने आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या १६ जणांच्या समितीने प्रमाणित सुचविलेल्या सुधारणांचा प्रमाणित कार्यप्रणालीत समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘मुंबई नेफ्रॉलॉजी ग्रुप’ची एक बैठक आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याबरोबर झाली. त्यानंतर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या संघटनेचे सचिव व हिंदुजा रुग्णालयातील मूत्रपिंड विभागाचे प्रमुख डॉ. अॅलन अल्मेडा यांनी सांगितले. मुंबईत एकूण ५० डॉक्टरांकडे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे परवाने मुंबई- ठाण्यात ३३ रुग्णालयांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मान्यता राज्यात एकूण ७२ रुग्णालयांमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात सद्यस्थितीत देशात पाच लाख किडनी रुग्ण, ५ हजार यकृत व दोन हजाराहून अधिक हृदयरुग्ण अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत.