कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य; करोनाविरोधातील लढय़ात कुमक कमी पडत असल्याने निर्णय

मुंबई : पाणी, कचरा व्यवस्थापन आदी दैनंदिन व्यवस्थेबरोबरच करोना रुग्णांवरील उपचार, संशयितांचा शोध, अलगीकरण व्यवस्था, कामगार-बेघरांना व प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना अन्नपुरवठा या करोनाविरोधातील लढय़ासाठी पालिकेची मनुष्यबळाची कुमक कमी पडत आहे. म्हणून आता प्रशासनाने पालिकेमध्ये ५० टक्के उपस्थितीचे आदेश रद्द करून १०० टक्के उपस्थिती अनिवार्य के ली आहे. आतापर्यंत एकदिवस आड कार्यालयात येणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दररोज उपस्थिती लावणे बंधनकारक झाले आहे.

करोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारने पाच टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबईमध्ये वाढत असलेला करोना संसर्ग आणि बाधित, संशयितांना द्यावी लागणारी वैद्यकीय सेवा लक्षात घेऊन पालिकेत ५० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अधिकारी, कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित राहात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोना संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता पालिका कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेच्या अन्य विभागांतील पनवेल, बदलापूर, आसनगाव, वसई आणि मुंबईच्या हद्दीबाहेरील अन्य भागांत राहणारे कर्मचारी, कामगारांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य होत नाही. अशा कर्मचारी, कामगारांनी खातेप्रमुखांची परवानगी घेऊन घरापासून जवळ असलेल्या पालिकेच्या विभाग कार्यालयात उपस्थित राहावे आणि नेमून दिलेले काम करावे, असे आदेश प्रशासनाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकात दिले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करण्याचे आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता परिवर्तीत रजा मंजूर करण्याचे आदेश यापूर्वी प्रशासनाने दिले होते. मात्र मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन हे आदेश रद्द करण्यात आले आहेत. प्रशासनाला आवश्यकता वाटल्यास अशा कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. कार्यालयात हजर राहण्याची सूचना धुडकावणाऱ्यांविरुद्ध साथरोग कायदा १८९७ अंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

पत्ता, संपर्क क्रमांक देण्याचे आदेश

सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपला संपर्क पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आदी संबंधित माहिती तात्काळ आस्थापना विभागाला उपलब्ध करावी. तसेच संपर्क पत्त्यावर ते उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. सूचना मिळाल्यानंतर कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे प्रशासनाने परिपत्रकाच्या माध्यमातून बजावले आहे. प्रशासनाच्या या नव्या परिपत्रकामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे.