मुंबईतल्या लालबाग परिसरातल्या एका आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. या आगीमधून बाहेर पडण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने १९ व्या मजल्यावरुन उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनाक्रमादरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल चहल हे देखील घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चहल यांनी ही आग नियंत्रणात आल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी एक चिंताही व्यक्त केली आहे.

घटनास्थळावरुन माध्यमांशी संवाद साधताना चहल म्हणाले, “इथे जी दुर्दैवी घटना घडली आहे तिला दोन भागात बघितलं पाहिजे. सर्वात आधी म्हणजे ही आग लवकरात लवकर विझवायला हवी. आम्हाला ११ वाजून ५१ मिनिटांनी माहिती मिळाली आणि लगेचच तिथे लोक पोहोचले. ही आग आता विझवली गेली आहे. आमचे अधिकारी त्या इमारतीतच आहेत. आणखी काही घटना घडू नये यासाठी ही आग कायमची विझवली गेली पाहिजे. कारण अजूनही धूर येत आहे. आग विझली नाही तर ही आग पुन्हा लागण्याची शक्यता आहे. कारण तशा काही गोष्टी इमारतीमध्ये आहेत. इथे एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल”.

हेही वाचा – Lalbaug Fire: ‘बिल्डरने कोट्यवधींची फसवणूक केली…’, आयुक्तांसमोर रहिवाशांनी व्यक्त केला संताप

अशा घडल्या घडामोडी –

  • आज दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास मुंबईतल्या लालबाग परिसरातल्या वन अविघ्न या इमारतीला भीषण आग लागली.
  • पाचव्या माळ्यावर लागलेली आग काही वेळातच १९ व्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली.
  • १९ व्या माळ्यावर फर्निचरचे काम सुरु असताना शॉकसर्किट झाले आणि आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
  • दरवाजा उघडल्यानंतर आग अंगावर आल्याने सुरक्षारक्षकाने पळण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाल्कनीमध्ये गेला. तिथे तो लटकत होता तिथून तो खाली. खाली पडल्यानंतर जागीच त्याचा मृत्यू झाला.
  • केईएम रुग्णालयामध्ये या ३० वर्षीय सुरक्षारक्षकाला दाखल करण्यात आलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
  • तासाभरानंतर अग्निशामन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
  • अरुंद रस्ते, उंच इमारत अशा अनेक अडचणीनंतर अखेर अग्निशामक दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.