मुंबई : एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून दिलासा व सुरक्षा मिळत असल्याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. काही विशिष्ट पक्षाच्या लोकांना सातत्याने न्यायव्यवस्थेकडून दिलासा मिळत असल्याने शंका तर उपस्थित होणारच, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून दिलासा व सुरक्षा दिली जात आहे. मात्र हे दिलासे व सुरक्षा महाविकास आघाडीच्या लोकांना मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार राऊत यांनी, दिलासा घोटाळा हा न्यायव्यवस्थेला अलीकडे लागलेला डाग आहे. हा दिलासा अल-कायदा आणि कसाबपेक्षा भयंकर आहे. एकाच पक्षाचे ठग दिलासा घोटाळय़ाचे लाभार्थी कसे असू शकतात, असा सवालही राऊत यांनी केला आहे.