मुंबई : वाढता उकाडा आणि उन्हाच्या तडाख्यामुळे शहर आणि आसपासच्या भागातील अनेक प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास होत आहे. मात्र, वनविभागाने काही संस्थाच्या सहकार्याने वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे या प्राण्यांना जीवदान मिळाले आहे. आतापर्यंत ९० हून अधिक प्राण्यांचे जीव वाचविण्यात वनविभागाला यश आले आहे.

जीवघेणा उकाडा आणि उन्हाच्या चटक्याचा केवळ मुंबईकरांनाच नव्हे तर पशु-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. मागील काही दिवसांपासून विविध भागात निर्जलीकरणामुळे पक्षी व प्राणी जखमी अवस्थेत आढळले. मात्र, वनविभागाने काही संस्थाच्या मदतीने उपाययोजना करीत त्यांचे प्राण वाचवले. या काही दिवसांपूर्वी वन विभाग आणि रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर (रॉ) या संस्थेने तब्बल ९० हून अधिक प्राण्यांना जीवदान दिले.

मुंबई शहर, बोरिवली, अंधेरी या भागात पोपट, घुबड, कावळे, माकड आणि मांजर आदी पशु-पक्षी अशक्त अवस्थेत आढळले होते. स्थानिक रहिवाशांनी याबाबतची माहिती तात्काळ वनविभाग आणि रॉ या संस्थेला दिली. संस्थेच्या पशुवैद्यकीय पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित प्राण्यांवर प्राथमिक उपचार केले. त्यांनतर काही दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्यांनतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मागील अनेक वर्षांत उन्हाळ्यात निर्जलिकरणामुळे मोठ्या संख्येने माकडे, पोपट अशक्त होत आहेत. या काही महिन्यात आम्ही सुमारे १०० पशु-पक्ष्यांची सुटका केल्याचे ‘रॉ’ संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले. नागरिकांनी सतर्क राहावे आणि उष्माघातात्रा त्रास होत असलेल्या पशु-पक्ष्यांविषयीची माहिती वनविभागाला तातडीने मदत क्रमांक १९२६ वर द्यावी, असेही शर्मा यांनी सांगितले.

जखमी पक्षी, प्राणी आढळल्यास काय करावे

– प्राणी किंवा पक्षी जखमी झाल्यावर घाबरलेले असतात. त्यामुळे त्यांच्याजवळ शांतपणे जावे.

– जखमी प्राणी वेदनेने आक्रमक होऊ शकतो. त्यामुळे त्याला शक्यतो थेट हात लावू नका.

– रस्त्यावरील किंवा उघड्यावरील प्राण्याला सावधगिरीने उचलून सावलीत किंवा सुरक्षित जागी ठेवावे.

– वनविभाग किंवा प्राणीप्रेमी संस्थांशी तात्काळ संपर्क साधावा.

– स्वत: उपचार करू नये.

– निर्जलीकरण झाल्यास थोडे पाणी द्यावे, मात्र खाद्य देऊ नये.

निर्जलीकरणाची लक्षणे

पक्ष्यांना उडण्यात किंवा हालचाल करता येत नाही.

डोळे अर्धवट बंद किंवा निष्प्रभ होतात.

अन्न व पाण्याकडे दुर्लक्ष करतात.

हालचाल मंदावते किंवा थकवा येतो.

उपचार कसे होतात

निर्जलीकरणाचा त्रास झाल्यावर पक्षी जखमी अवस्थेत जमिनीवर पडतात. अशा परिस्थितीत पक्ष्यांना थंड कापडात ठेवण्यात येते. तसेच त्यांना पाणी पाजण्यात येते. आवश्यकता भासल्यास प्राणीमित्र संस्थेत नेऊन त्यांच्यावर प्रथमोपचार करतात. त्यानंतर तरतरी आल्यावर संबंधित पक्ष्यांना निसर्गात सोडण्यात येते.

पाळीव प्राण्यांची अशी काळजी घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उष्णतेचा परिणाम पाळीव प्राण्यांवरही होतो. त्यांना उन्हाळ्यात शक्यत तितके घरातच ठेवा. घरामध्ये ठेवणे शक्य नसेल, तर त्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवा. उष्ण वातावरणात पिंजरे गरम होतात. त्यामुळे त्यांना पिंजऱ्यात ठेवू नये. त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या. उन्हात गरम झालेले पाणी किंवा अस्वच्छ पाणी पिण्यास देऊ नये, यामुळे प्राण्यांना उष्णतेचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते.