बांधकाम परवानगीसाठी महत्त्वाची अट खासगी विकासकांकडून बांधण्यात येणाऱ्या मोठमोठय़ा गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये जलतरण तलाव निर्माण केले जात असतील तर तेथे प्रशिक्षित जीवरक्षकांच्या नेमणुका करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशिक्षित जीवरक्षक नेमण्याच्या अटीवरच गृहनिर्माण प्रकल्पांच्या बांधकामाना परवानगी देण्यात येईल, असा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. वाढते औद्योगिकीकरण तसेच माहिती-तंत्रज्ञान उद्योगात झालेली वाढ यामुळे महानगरपालिका क्षेत्रात मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्पही उभारले जात आहेत. अनेक ठिकाणी टाऊनशिप अस्तित्वात येत आहेत. अशा गृहप्रकल्पांमध्ये विविध सुविधांमध्ये जलतरण तलावांचा समावेश असतो. मात्र जलतरण तलावाबाबत त्याचे व्यवस्थापन, जीवरक्षक पात्रता यावर स्थानिक प्राधिकरणाचे कोणतेही नियंत्रण नसते. पोहणाऱ्यांचे जीव वाचविण्यासाठी जीवरक्षकांच्या नेमणुका केल्या जातात. परंतु ते प्रशिक्षित आहेत किंवा नाहीत, याबाबत कसलीही खातरजमा केली जात नाही. काही ठिकाणी तर पोहता येत नसलेल्या जीवरक्षकांना ते प्रशिक्षित असल्याची प्रमाणपत्रे दिल्याचे आढळून आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत पोहणाऱ्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देणे, पोटातून पाणी बाहेर काढणे, प्रथोमचार देणे गरजेचे असते. माणसाचा जीव वाचविण्यासाठी जीवरक्षकाला हे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. परंतु जलतरण तलावासाठी नेमण्यात आलेल्या किंवा येणाऱ्या जीवरक्षकांच्या पात्रतेबाबत कसलीही माहिती दिली जात नाही, त्याची नोंद केली जात नाही, अशा तक्रारी आहेत. विधिमंडळातही त्यावर चर्चा झाली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने जलतरण तलावासाठी प्रशिक्षित जीवरक्षक नेमणे बंधनकारक केले आहे. ही अट मान्य केल्याशिवाय खासगी विकासकांना बांधकाम परवानगी देण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.