लोकसत्ता,विशेष प्रतिनिधी

मुंबई: नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला तर मृतांव्यतीरिक्त काही पर्यटक जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या या भयावह कृत्याचा निषेध करत मुंबईतील लीलावती हॉस्पिटलने मदतीचा हात पुढे केला आहे. दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याला गमावले आहे किंवा जखमी झाले आहेत अशा व्यक्तींना याठिकाणी मोफत वैद्यकीय उपचार दिले जाणार आहे.

संकटाच्या काळात भारतीय सैन्य, भारत सरकार आणि आपल्या नागरिकांना मदत करण्यासाठी लीलावती रुग्णालयाच्या वतीने हे स्तूत्य पाऊल उचलण्यात आले आहे. लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे स्थायी विश्वस्त श्री. राजेश मेहता सांगतात की, काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत प्रत्येकालाच खूप मोठा धक्का बसला आहे.

श्रीमती चारुबेन मेहता (संस्थापक, लीलावती हॉस्पिटल फॉर लाईफ फॉर लाइफ, स्थायी विश्वस्त) यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय मदत पुरवण्याचा आम्ही निश्चय केला आहे. राष्ट्रावर आलेल्या संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे सरसावत पिडीतांना व त्यांच्या कुटुंबियांना आम्ही सर्वतोपरी वैद्यकिय मदत करत आहोत. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना आणि कुटुंबातील सदस्य गमावलेल्या व्यक्तींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवणार जाणार आहे. याकरिता त्वरित मदतीसाठी +91 – 84228 91032 हा हेल्पलाईन क्रमांक जाहिर करण्यात आला आहे.

ज्यांना वैद्यकीय सेवा आणि मदतीची आवश्यकता आहे त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा असे आम्ही आवाहन करतो. या संकटकाळात लीलावती हॉस्पिटलची संपुर्ण टीम पिडीतांच्या सेवेसाठी सज्ज असून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही याठिकाणी करण्यात आले आहे.