देशातील बहुतेक सर्वच क्रीडा संघटना या भ्रष्टाचाराचे केंद्र बनल्याने या संघटना बरखास्त करून त्या स्वतंत्र यंत्रणांच्या हाती सोपवणे हाच पर्याय असल्याची ठाम भूमिका घेणाऱ्या ‘लोढा आणि लोढणे’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा सातऱ्यातील ‘छत्रपती शिवाजी महाविद्यालया’चा आदित्य बनसोडे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर, या स्पर्धेत मुंबईतील माटुंगा येथील ‘रामनारायण रूईया महाविद्यालया’चा विद्यार्थी विनायक आरोटे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘लोढा आणि लोढणे’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या आदित्य आणि विनायक यांनी चांगले लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’स्पर्धेत बाजी मारली. आदित्य यास सात हजार आणि प्रमाणपत्र तर विनायक यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

या अग्रलेखावर व्यक्त होताना अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारी वृत्तीला चालना देत लेखन केले आहे.

राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षक तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षीसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers  या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.