एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचा, औद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ चं आयोजन करण्यात आलं आहे. या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेत त्याची रूपरेखा मांडली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला उद्योजकांची आणि उद्योगाची आपल्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे असे म्हटले आहे.

“इतर राज्यातील मुख्यमंत्री इकडे महाराष्ट्रात येतात आणि आम्ही आमच्या राज्यात काय देतो हे सांगून त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्यास सांगतात. ते ऐकल्यावर काही जण तिकडे जातातही. पण अनेकजण इथेच आपल्या महाराष्ट्रात राहतात. मी आज आपल्या सर्वांना आपलेपणाची भावना देण्यासाठी इथे आलो आहे. ही माझी कर्मभूमी आहे. यातून राज्याचीच नाही तर देशाची सुबत्ता मी वाढवणार आहे हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. उद्योजक होणे म्हणजे स्वत: एकट्याची सुबत्ता मिळवणे नाही. तर इतरांनाही सोबत घेऊन त्यांच्या आयुष्यात सुबत्ता देणारे आपण आहोत असे सांगणारा वर्ग आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“दुर्देवाने आजच्या वातावरणात मी सावधतेनं पावलं टाकतोय. अजूनही करोनाचं संकट पूर्ण गेलं नाही. काहीकाही जुने व्हायरस परत आलेत. जुने व्हायरस कारण नसताना साईड इफेक्ट आणत आहेत. त्यामुळे दोघांचा बंदोबस्त करायचा आहे. जगभराचा अनुभव घेतल्यानंतर १०० दिवसानंतर करोनाचा व्हायरस पुन्हा वरती येतो. त्यामुळे मधला काळ अर्थचक्राला गती देण्यासाठी वापरला पाहिजे. काहीजण सांगतात तुम्ही हे उघडले तर ते का नाही उघडत. जरा थांबा आपण एक एक टप्प्याने सगळंच उघडाचं आहे. कोणाला बंधनात ठेवयाचं नाही. हळुवारपणे मास्कसुद्धा काढून ठेवायचा आहे. पण तो घाईघाईत काढला तर मग आपण कधीच मास्क काढू शकणार नाही अशी शंका मनामध्ये येते. इथे सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवून जाणीव करुण द्यायला पाहिजे की, तुमचं राजकारण चालू राहील पण आज जनतेसमोर त्यांच्या रोजीरोटीची भ्रांत आहे. त्याचं पहिलं काय करणार ते सांगा. जर रोजीरोटी मिळाली नाही तर संपूर्ण राज्यात, देशात आणि जगात अस्वस्थता आणि अस्थितरता माजल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मला पुढच्या काळामध्ये या उद्योजकांची आणि उद्योगाची आपल्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या परिसंवादातून औद्योगिक क्षेत्रातील बदल व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे याचा आराखडा समोर आणण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, साहाय्यक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सिडको कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.,कॉर्पोरेट पार्टनर कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आहेत.