मुंबई:  करोनाची आपत्ती ही संधी समजून पर्यटन विभागाने गेल्या दीड वर्षांत राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. पुढील काळात सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) ३७ पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार असून तेथे पंचतारांकित सुविधा निर्माण के ल्या जाणार असल्याचे पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांनी शुक्रवारी जाहीर के ले. तर पर्यटनस्थळांवर अनिर्बंध बांधकाम होऊन विद्रूपीकरण होऊ नये यासाठी विकास आराखडा तयार करून नियोजनबद्ध विकास करण्याचे धोरण आखण्यात येत असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी दिली.

लोकसत्ता आयोजित पर्यटन परिषदेत ‘मार्के टिंग मॅग्निफिशिएंट महाराष्ट्र’ चर्चासत्रात ते बोलत होते. वीणा वल्र्डचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाटील, कामत हॉटेल्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल कामत  आणि पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर  सहभागी झाले होते. आगामी काळात पर्यटनाच्या जागतिक नकाशावर महाराष्ट्र नवी उंची गाठेल असा विश्वास या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त के ला.

करोनामुळे गेले दीड वर्ष पर्यटन उद्योग बंद असल्याने या काळाचा उपयोग एमटीडीसीच्या ठिकठिकाणच्या रिसॉर्टचा विकास करून तेथे उत्तम सुविधा निर्माण करण्यावर महामंडळाने भर दिला. येत्या काळात काही नवीन पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार असून पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी खासगी क्षेत्राच्या सहभागातून पहिल्या टप्प्यात सात तर दुसऱ्या टप्प्यात ३० पर्यटनस्थळांवर पंचतारांकित सुविधा निर्माण के ल्या जाणार असल्याचे जयश्री भोज यांनी जाहीर के ले. राज्यात अधिकाधिक पर्यटक यावेत यासाठी  पर्यटन स्थळांची साखळी निर्माण करण्याबरोबरच पर्यटन कं पन्यांसोबत सामंजस्य करार करणार आहोत. त्याबाबतचे धोरण दोन महिन्यांत आणणार असल्याचेही भोज यांनी जाहीर के ले.

पर्यावरणाचे संवर्धन राखून राज्यातील पर्यटन उद्योगाचा शाश्वत विकास करण्याचे धोरण असून पर्यटनस्थळांचे सौंदर्य अबाधित राहावे, अनिर्बंध विकासातून विद्रूपीकरण होऊ नये यासाठी विकास आराखडा आखून नियोजनबद्ध विकास करण्यात येणार असल्याचेही बोरीकर यांनी जाहीर

के ले.  चिपी विमानतळ सुरू झाल्याची संधी साधून आता कोकण व त्या आसपासच्या पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या विकासाचा एकत्रित विचार करून पर्यटनस्थळांची एक साखळी तयार के ली पाहिजे. पर्यटन विभागाने त्यासाठी सर्व संबंधितांमध्ये समन्वय घडवून आणण्याची व आवश्यक धोरणे आखण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी अपेक्षा सुधीर पाटील यांनी व्यक्त के ली.

तर करोनाच्या आपत्तीमुळे आजवर दुर्लक्षित पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी सर्व जण पुढे येत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. हॉटेल व्यवसायाबरोबरच इतर सर्व संबंधित व्यवसायिकांनी एकत्रित प्रयत्न के ल्यास राज्यातील पर्यटनाचा वेगाने विकास होईल, असे विशाल कामत यांनी सांगितले. गडकिल्ल्यांवर पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यासाठी राज्य किल्ले योजना लवकर जाहीर करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी अशा १० किल्ल्यांचा विकास करण्यात येणार आहे, असे डॉ. धनंजय सावळकर यांनी सांगितले. राज्यातील पर्यटनस्थळांना भेट देणारे पर्यटक किती त्याची नेमकी संख्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यातील ३५० पर्यटनस्थळांवर येणारे एकूण पर्यटकांची संख्या शासनाला प्राप्त होत नाही. त्याचा अभ्यास केला जात असून येत्या तीन महिन्यांत याबाबतचा अहवाल तयार होईल. त्यामुळे नियोजन करणे शक्य होईल, असेही सावळकर म्हणाले.  ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक सौरभ कु लश्रेष्ठ यांनी  संवादकांची जबाबदारी पार पाडली.